गेल्या काही दिवसांपासून मी “मिसळ पाव” बद्दल अधुनमधून बरेच काही ऐकत होतो – कधी कर्णोपकर्णी तर कधी मिपाच्या वाचकवर्गांतल्या एकदोघांकडून तर कधी अरूण मनोहरांसारख्या लेखकमंडळींकडून.
आता मिसळपाव हे एक समूह-संकेतस्थळ. तसे पहायला गेलो तर मी ओर्कुट, फेसबुक आणि तत्सम समूह-संकेतस्थळांवर नावा पुरती हजेरी लावतो खरा, पण वावर फार नसल्यातच जमा. अहो दररोज प्रत्यक्ष दिसणारे तेच ते मित्र/मैत्रिणी इथेही पुन्हा भेटणार आणि “अरे, कसा काय? इकडे कुठे? हल्ली काय करतोस?” अश्या शिळोप्याच्या गप्पा मारणार. ह्या गप्पा काय, ईमेल नाहीतर फोनवरून सुद्धा आपण मारतोच की त्यासाठी एका वेगळ्या संकेतस्थळावर जायची गरज काय? शिवाय समूह-संकेतस्थळांवर अपेक्षित असते ती विचारांची देवाणघेबाण, नव्या ओळखी ती इथे नसतेच. ह्याचे कारण मुळात त्या-त्या संकेतस्थळांच्या बांधणीत आणि मांडणीत आहे. खरडवही हा त्यांचा पाया त्यामुळे, आपल्याला जो कोणी खरड लिहील तो (किंव्हा आपण ज्याला खरड लिहू तो) काय म्हणतोय ह्या पलिकडे फारशी देवाणघेवाण होतच नाही. अर्थात तिथेही “समूह” असतात, नाही असे नाही पण ते सुद्धा विषयावार. त्यामुळे कुठल्याही अशा समूहात एकापेक्षा अधिक जास्त विषयांवर होणार्या चर्चांची मांडणी ही फक्त मोठ्ठी यादी असते. तिथे येणार्या व्यक्तिला रुचेल/पटकन कळेल अशा स्वरुपाची केलेली नसते.
Continued…